Saturday 16 April 2016

सखाराम गटणे

गटण्याचा हा 'व्यासंग' पाहून मी थक्क झालो. शब्द तर डबक्यावर शेवाळ माजावे तसे माजले होते. नेत्रदीपक काय, आल्हाद काय, मनाची प्रगाढ खोली काय--छे! पोट साफ करायच्या औषधासारखे तोंडातले हे शब्द साफ करणारे एखादे ओषध का नाही निघत, ह्या विचारात मी पडलो. शेवटी काही तरी बोलायचे म्हणून मी म्हटले, "वा! खूप बारकाईअनं अभ्यास चालवला आहेस--"
.

"माझ्या जिवनातल्या वाडःयीन कालखंडातलं शेवटलं प्रकरण आहे."
.

"म्हणजे?" हा मुलगा आता जीवजीव देणार आहे की काय अशी मला भीती वाटली, कारण असली पुस्तके खाऊन जगणारी मुले भलत्याच कुठल्यातरी श्रीमंताच्या नुसत्याच गो-या म्हणून सुंदर मानल्या गेलेल्या पोरींच्या प्रेमात पडतात आणि जीव तरी देतात किंवा डरपोक असली तर 'ऍंग्री यंग मेन' म्हणून चित्रविचीत्र पोशाख करून हिंडतात आणि दुस-याच्या खर्चाने कॉफीहाऊसमध्ये कॉफी पीत भयाण दिसणा-या, रोडक्या, माफक मिशीवाल्या पोरींबरोबर घाणेरड्या चित्रांतली आणि कवितांतली कला शोधत बसतात. पण गटण्या त्यांपैकी कशातच बसण्यासारखा नव्हता. नुसता फटाका फुटल्याचा आवाज सांगण्याचा प्रयास करीत होता, पण त्याला पुन्हा एकदा रडू फुटत होते. एकूण चमत्कारिकच प्रसंग होता.
.

शेवटी गटण्याने आपले रडू आवरीत बोलायला सूरूवात केली.
.

"मला क्षमा करा. यापुढं मी अपल्याला कसलीच तसदी देणार नाही."
.

"म्हणजे?" मी आपल्या मित्रमंदळीत ह्या गटण्याची कधी तरी चेष्टा केली होती. ती ह्याच्या कानावर गेली की काय? पण ते शक्य नव्हते. आमचे मित्र आणि गटणे यांचा सबधंच येणे सभंवत नव्हते. एक पोलीस प्रॉसिक्युटर, एक मोटारीचे स्पेअर पार्ट विकणारा, कोणी फायर इन्शुरन्स एजंत, तर कुणी मिलीटरीतला कप्तान असल्या माझ्या कथाकाव्याच्या वाटेलादेखील चुकून न जाणा-या निरोगी मित्रांत मीच फक्त लेखनकामासाठी करणारा होतो. ते जगत होते आणि मी लिहीत होतो. आमच्या मित्रांच्या वासाने गटण्याला घेरी आली असती. मी गटण्याची समजूत काढायची म्हणून म्हटले, "अरे तसदी कसली?"
.

"तसं नाही. तुम्ही फार केलंत माझ्यासाठी. वटवृक्षाच्या शितल छायेत अनेक पांथस्थ येतात त्याची वटवृक्षाला काय कल्पना?"
.

गटण्य़ाच्या ह्या वाक्याने गटणे 'नॉर्मल'वर आला हे मी ओळखले. मला वटवृक्षाची दिलेली उपमा पाहून उगीचच माझ्या नाकाखाली एक पांरबी लोंबायला लागली आहे असे मला वाटले आणी हसू आले.
.

"आपण माझ्या ह्या मुग्ध वाक्याला हसणं साहजिकच आहे. पण आपल्या मायेच्या शीतल छायेत बसणं माझ्या नशिबात नाही. जीवनात--"
.
"अरे पण--" मला ह्या 'जीवन' वगैरे शब्दांची भयंकर धास्ती वाटते. जगण्याला 'जीवन' म्हणावे अशी माणसे हजार वर्षातून एकदा जन्माला येतात. गटण्याने स्वतःच्या जगण्याला 'जीवन' म्हणणे म्हणजे सशाने स्वतःच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यापैकी होते. त्याचे ते जीवनापासून सूरू होणारे वाक्य मध्येच तोडून मी म्ह्टले, "अरे पण गटणे, झालं काय असं?"
.

"माझ्या जीवनात आता एक नवं पर्व सुरू होतंय!"
.

मुलगा अगदीच हाताबाहेर गेला होता. साइनबोर्ड पेंटरचा हा मुलगा स्वतः जणू काही महाभारताचा नायक असल्यासारखा पर्वविर्व म्हणायला लागला होता.
.
"कसलं पर्व?"
.
"कसं सांगू?" आपले भित्रे डोळे पायच्या आंगठ्याला लावून गटणे म्हणाला.
.
मग माझी खात्री झाली की, बापाच्या नावाचा बोर्ड रंगवून घ्यायला आलेल्या कुठल्या तरी मोटारीतून उतरणा-या गो-या तरूणीने गटाण्याचा खातमा केला. आजवर वाचलेल्या सर्व कादंब-यांचा कथानकांचे तात्पर्य ह्याच्या बापाच्या ध्यानी आले असणार आणि सखाराम गटणे तिथेच समात्प झाला असणार! शेवटी मीच होऊन त्याला विचारले,
.
"कुठे प्रेमाविमात पडलास की काय?"
.
"नाही!" विजापूरच्या चिमुकल्या शिवाजीने छाती काढून बादशहाला सांगावे तशी आपली अठ्ठावीस इंची छाती काढुन तो म्हणाला, "आजच्या जगात विशुद्ध प्रेम कुठंच मिळत नाही."
.
"कुणी सांगितलं तुला?"
.
"आपल्याच 'पाखरांची शाळा' नाटकातल्या नायकांच्या वाक्य आहे हे!"
.
मी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. 'पाखरांच्या शाळे' तले एक विनोदी पात्र हे वाक्य म्हणते. शेवटी मलाही हा प्रकार असह्य झाला आणि मी म्हटले,

"मग झालं काय तुला? एवढा तरुण तू, इतका व्यासंगी--माझ्यापेक्षादेखील तुंझ वाचन दांडगं--आणि रडतोस?"
.
"काय करू? परिस्थिती हा अश्रूंचा सर्वात मोठा कारखाना आहे असं वाळिंबे म्हणत असत."
.
"कोण वाळिंबे?"
.
"आमच्या प्राज्ञेचे सर!"
.
तो कोण वाळिंबे भेटला असता तर जुन्या सुलतानासारखा मी त्याला उलटा टांगून पुस्तके जाळून त्याची धूरी दिली असती.
.
"असली काय परीस्थीती आली तुझ्यावर?"
.
"माझ्या वडिलांना माझ्या जीवनाचं ध्येय कळत नाही."
.
माझ्या डोळ्यांपुढे सखाराम गटण्याचा पेंटर बाप आला. मी त्याला काळा की गोरा ते पाहिले नव्हते. बाकी पेंटर असल्यामुळे काळागोराच काय, तो अनेकरंगी असेल. त्या, अक्ष्ररे इंचावर मोजून रंग भरणा-या इसमाला त्याच्या घरात जन्माला आलेल्या ह्या बालबृहस्पतीचे जीवनध्येय काय कळणार? 'जीवनध्येय' म्हटल्यावर "कुठल्या साइजमध्ये लिहू साहेब?" म्हणणारा इसम तो!
.
"काय जीवनध्येय कळंल नाही त्यानां?"
.
"त्यांनी माझं लग्न करायचं कुटील कारस्थान रचलंय!" गटण्याचे लहानसे जांभळट ओठ थरथरत होते.
.
"अरे, मग कुटील कारस्थान कसंल त्यात? तुला लग्न करायचं नसल तर नाही म्हणून सांग!"
.
"तिच विनंती करायला मी आलो होतो. मला माझं काही वाटत नाही जीवनाच्या समरात..."
.
पुन्हा 'जीवन'! गटणे आता बाधं फोडून बोलत होता.
.
"...जीवनाच्या समरात रक्तबंबाळ व्हायचे प्रसंग यायचेच."
.
"अरे, चांगलं लग्न ठरवताहेत वडील तर रक्तबंबाळ कसाला होतोस?"
.
"मला माझं काही वाटत नाही. मी वडिलांच्या आज्ञेनुसार विवाहबंधनात स्वतःला जखडून घेईनही! प्रभू रामचंद्र हा माझा आदर्श आहे! मीही वडिलांची अनुज्ञा पाळीन."
.
प्रभू रामचंद्राने लग्न झाल्यावर अनुज्ञा पाळली होती हा तपशील गटणे विसरला. त्या एवढ्याशा देहातून प्रभू रामचंद्र वगैरे शब्द ऎकताना मला हसू आवरेना.
.
"बरं मग तुझं काय म्हणणं? मी तुझ्या वडलांना येऊन भेटू?"
.
"हे मी आपल्यावर सोपवतो. मी लग्नाला तयार आहे."
.
आता मात्र मला कळेना की हा वीर जर मान उतरवून द्यायला तयार आहे तर मी जाऊन काय शत्रूच्या तलवारीला धार काढून देऊ?

Monday 8 June 2015

अभ्यास : एक छंद

माझ्या विद्यार्थी मित्रांनो,

मला तुमच्याशी बोलायची संधी मिळते आहे याचा खुप आनंद झाला. एकच गोष्ट जराशी खटकली, ती म्हणजे मी इथं बोलत असताना तुम्ही मला दिसत नाही आणि मी तुम्हांला दिसत नाही. मी तुम्हाला दिसलो नाही म्हणून फारसं बिघडत नाही. तुमच्या आवडत्या सिनेनटारारखा मी देखणाही नाही. पोशाखाबिशाखाच्या बाबतीतही ही कानगोष्ट आहे म्हणूनच सांगतो. जरासा गबाळाच आहे. आताच माझ्या लक्षात आलंय, की मी माझ्या बुशकोटाचे चौथे बटण तिसर्‍या काजात खुपसून तिसर्‍या बटनाला वार्‍यावरच सोडलं आहे.

पण ते काही का असेना, तुमच्याशी बोलताना माझं काही चुकलं नाही म्हणजे झालं. शिवाय समर्थांनी म्हटलचं आहे, की वेश असवा बावळा. माझ्या अंगी नाना कळा काही नाहीत. तरीही 'वेश असावा बावळा, परि अंगी असाव्या नाना कळा' हे समर्थाचं वचन मी इमानानं पाळत आलो आहे.

तेव्हा तुमच्याशी बोलताना शेक्सपिअरच्या ज्युलियस सीझर नावाच्या नाटकातला मार्क ऍंटनी म्हणतो तसं मीही थोडासा फरक करून म्हणेन, 'मित्र हो, भारतीय हो आणि बालनागरिक हो, जरा तुमचे कान इकडे करा.' मी शाळेत होतो त्या वेळी जेव्हा माझे गुरुजी 'इकडे कान कान कर' म्हणायचे, त्या वेळी ते काही निराळ्या कारणाने म्हणत असत. त्या अर्थाने नाही म्हणत मी....मी काय सांगणार आहे ते ऎकाल का? अशी विनंती करण्य़ासाठी म्हणतो आहे-- माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो जरा इकडे कान द्या.

खरं सांगायचं म्हणजे तशी आपली अगदीच ओळख नाही असं नाही. कदाचित माझी संपूर्ण पुस्तकंही तुमच्यापैकी काहीजणांनी आणि काहीजणींनी वाचली असतील. म्हणजे यापूर्वी मी तुमच्याशी पुस्तकांतून बोललो आहे. लेख लिहिणं म्हणजे दुसरं काय? पुस्तकांतून तुमच्याशी बोलणंच की नाही? माझी गोष्ट सोडा. मी फार थोर लेखक नाही, पण तुमच्याशी पुस्तकांतून निरनिराळ्या विषयांवर किती थोर माणसं बोलत असतात. ज्ञानेश्वर बोलतात, तुकाराम महाराज बोलतात, सानेगुरुजी बोलतात, जोतीबा फुले, टिळक, आगरकर, हरी नारायण आपटे, गडकरी, केशवसुत, बालकवी असे संत, विचारवतं कादंबरीकार, नाटककार , कवी तुमच्याशी बोलत असतात. वास्तविक ही माणसं आज आपल्यात नाहीत. तरी त्यांचं बोलणं मृत्युसुद्धा थांबवु शकला नाही. तुम्ही एखाद्या थोर लेखकाचा धडा म्हणून जेव्हा वाचता तेव्हा तुमच्या लक्षात हे आलंय का, की आपण एका थोर माणसाच्या सहवासात आहोत? हे तुमच्या लक्षात केव्हा येईल ठाऊक आहे? तुम्ही ज्या वेळी पुस्तक हे थोरांना भेटण्याची संधी आहे या दृष्टीनं ते हाती घ्याल तेव्हा.

परीक्षेला पुस्तक नेमलंय म्हणून वाचलं पाहिजे अशा भावनेनं जर तुम्ही पुस्तक हातात धरलंत तर त्या लेखकाशी तुमचा संवादच सुरू होणार नाही. कादंबरी असो किंवा अगदी रुक्ष वाटणारं भूगोलाचं पुस्तक असो. कुणीतरी आपल्याशी केलेली ही कानगोष्ट आहे. कुणी आपल्याला खूप आवडलेली माहिती खूप हौसेनं देतो आहे. अशा भावनेनं जर आपण ते हाती धरलं नाही तर तुमचा संवादच सुरू होनार नाही.

एखादी कविता तुम्ही वाचत असताना एकदम म्हणता की नाही 'वा ! वा ! काय छान आहे ही ओळ !' एखादी विनोदी कथा वाचताना खुदकन हसता की नाही? अशा वेळी आई विचारत असते, 'काय रे मधू, एकट्यानंच हसायला काय झालं?' त्या वेळी आपण वरवर पाहणार्‍याला एकटेच आहोत असे वाटत असतं; पण आपण एकटे असतो काय? आपल्याशी चिं.वि.जोश्यांचे चिमणराव बोलत असतात. गडकर्‍यांचे बाळकराम ठकीच्या लग्नाची कथा सांगत असतात. आईला बिचारिला कसं कळणार, की तुम्ही त्या वेळी थोर विनोदी लेखकाशी कानगोष्टी चालवल्या आहेत ते?

नव्या सत्राच्या आरंभी तुम्हांला सांगायची मुख्य गोष्ट ही, की गणिताच्या काय, भूगोलाच्या काय किंवा भाषा विषयाच्या काय, कुठल्याही पुस्तकाच्या सहवासात तुम्ही असताना एखाद्या मित्राच्या सहवासात आणि तेदेखील आपल्यापेक्षा ज्यानं खूप निरनिराळ्या गोष्टींचा अनुभव घेतलाय अशा मित्राच्या सहवासात आता दोन-चार तास काढणार आहोत असे समजावे. म्हणजे जे पुस्तक अगीचच तुम्हांला परिक्षेची भीती घालत येतं, ते तुमच्या मित्रासारखी तुम्हांला वाटेल.

पोहता न येणार्‍या मुलांना पाण्याची भीती वाटते; पण एकदा पाण्याशी मैत्री केली, ते पाणी आपण त्याच्यावर कसे हातपाय मारले असताना हवे तितका वेळ उचलून धरतं हे कळलं, की सुट्टी लागल्याबरोबर आपण तलावाकडे किंवा नदीकडे एखाद्या मित्राच्या घरी जावं तशी धूम ठोकतो की नाही? सुरुवातीला जातं थोडं नाकातोंडात पाणी. पुस्तकांचं तसंच आहे. कधी कधी हा लेखक काय बरं सांगतोय ते कळतच नाही. अशा वेळी नाकातोंडात पाणी जातं म्हणून पाण्याशी वैर करणार्‍या भित्र्या मुलासारखं तुम्ही पुस्तकाशीच वैर केलंत, तर त्या मुलाला जसा मस्त सूरबीर मारून पोहण्याचा आनंद मिळत नाही, तसा तुम्हांलाही ज्ञानाचा आनंद मिळणार नाही.

मी कशाचा अनंद म्हणालो ? ज्ञानाचा आनंद नाही का ? तसा तो जड नाही. 'ज्ञान' म्हणजे काहीतरी कठीण गोष्ट आहे अशी आपली उगीचच समजूत करुन दिलेली असते. साध्या भषेत सांगायचं तर ज्ञानाचा आनंद म्हणजे 'अरेच्चा! आपल्याला कळलं' असे वाटून होणारा आनंद! मग तो एखाद्या यापूर्वी की न ऎकलेल्या शब्दाचा असेल../ न सुटणारं गणित सुटल्यावर होणार असेल किंवा एखाद्या संगितातला राग ओळखता आल्यावर होणारा असेल.

तुम्ही सगळे विद्यार्थी आहात नाही का? विद्यार्थी म्हणजे तरी काय? विद्‌ म्हणजे जाणणे, कळणे; अर्थी म्हणजे इच्छा असलेला. ज्याला काही कळून घेण्याची इच्छा आहे तो विद्यार्थी. आता काही कळून घ्यावं अशी ज्याला इच्छाच नसेल तो मात्र केवळ शाळेत जातो आणि हजेरीपटावर नाव आहे म्हणून त्याला विद्यार्थी म्हणता येईल का? नाही म्हणून तुम्ही माना हालवल्यात ते दिसलं बरं का मला. तेव्हा शाळेत आला आहात ते आपल्याला जे जे काही या जगात दिसतं त्यामागचं रहस्य काय आहे बुवा, ते कळावं म्हणून आला आहात.

या जगात लाखो वर्षापासून माणसांचं येणं आणी जाणं चालूच आहे. जन्मल्यापासून जास्तीत जास्त शंभर वर्षापर्यंत माणसाला देखील ट्यॅं... ट्यॅं... असा आवाज करत काही नवे रहिवासी आले असतील. मी किंवा तुमचे आईवडील, तुमचे गुरूजी, तुमच्या आधी काही वर्षे इथं आलो. त्या आधीही काही माणसं आली. आधी जी माणसं आली त्यांनी या जगात तुमच्यापेक्षा जास्त वर्ष काढल्यामुळे तुमच्यापेक्षा त्यांना अधिक गोष्टी कळलेल्या नाहीत किंवा समजायला अवघड जातात त्या समजावून देण्यासाठी तुमचे शिक्षक असतात.


आता तुम्हांला एखादी नवीन माहिती नेमकी कळली, की कळली नाही हे त्यांना कसं कळायचं? आपल्यापरीनं ते तुम्हांला वर्गात शिकवून सांगतात. मध्येच प्रश्न विचारतात. तुमच्या उत्तरावरुन त्यांना कळतं, की तुम्हांला नीट कळलयं की नाही ते; पण एवढ्या मोठ्या वर्गात सगळ्यांनाच प्रश्न विचारणं शक्य नसतं. अशा वेळी 'गुरुजी मला कळलं नाही' हे सांगण्याचं तुमच्यात धैर्य पाहिजे.

'अज्ञान' असणं यात काहीही चूक नाही; पण 'अज्ञान' लपवण्यासारखी चुकीची गोष्ट दुसरी कुठलीही नाही. विशेषत: कळण्याची इच्छा मनात बाळगुन येणारया तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी 'आपल्याला कळलं नाही' हे न सांगणं हा तर मी म्हणेन एक प्रकारचा अपराध आहे. न्युटनसारखा एवढा थोर वैज्ञानिक म्हणाला होता ना, की वाळवंटातल्या एका वाळूच्या कणाएवढीही मला विज्ञानाची ओळख पटली नाही म्हणून. मग तुम्हा-आम्हांला कसली लाज ! आपल्याला कळलं नाही की सरळ न घाबरता हात वर करावा आणि म्हणावं 'सर, मला इथपर्यंत कळलं. इथून पुढलं नाही लक्षात आलं.' चांगल्या शिक्षकांना असले प्रश्न विचारणारा विद्यार्थी फार आवडतो आणि चांगले शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर ठाऊक नाही; पण मी ग्रंथालयातून या विषयावर लिहिलेली पुस्तकं वाचून तुला उद्या उत्तर सांगेन.' विषयाला धरून प्रश्न विचारल्यावर विद्यार्थ्याला चांगले शिक्षक 'गप्प बस' असं कधीच सांगत नसतात.

तसं पाहायला गेलं तर आपण सगळे विद्यार्थीच आहोत. शाळेतलं शिक्षण संपल्यावर जर सगळ्यांनी नवीन माहिती मिळवायचं सोडून दिलं असतं तर जगात कधी प्रगती झाली असती का? हे जग इतक्या अजब अजब गोष्टींनी भरलं आहे, की त्यांतल्या एखाद्या गोष्टीचा थांगपत्ता लावायचा म्हणजे वयाच्या साठाव्या आणि सत्तराव्या वर्षींसुद्धा विद्यार्थ्यासारखंच त्या गोष्टीचा अर्थ समजून घायच्या मागे लागावं लागतं. मोठे गवई रोज पाच-पाच, सहा-सहा तास गायनाची मेहनत करत असत, हे ठाऊक आहे का तुम्हांला? अहमदजान तिरखवॉंसाहेब नावाचे आपल्या देशातले फार मोठे तबलजी. ते सांगत होते, की दहा-दहा, पंधरा=पंधरा तास त्यांचा सराव चालायचा. मी म्हणालो. "खॉंसाहेब तुम्हांला कंटाळा येतो का?" नव्वदाव्या वर्षीही ते तीस वर्षाच्या तरुणासारखा तबला वाजवत.

सांगायचा मुद्दा काय, एखाद्या गोष्टीचं रहस्य काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही त्याच्या मागे लागलात, की तो अभ्यास हासुद्धा एक खेळ होतो. मी तुम्हांला अभ्यासाच्या बाबतीत आणखी एक गुपित सांगणार आहे. पुष्कळदा आपल्याला वाटतं. की अमुक एक विषय आपल्याला आवडत नाही. समजा तुम्हांला वाटलं, इंग्लिश आपल्याला आवडत नाही. फार अवघड आहे. मग तोच विषय पकडा. बघू कशी माझ्याशी दोस्ती करत नाही तो, म्हणून त्याच्या मागे लागा. त्या भाषेच्या काय काय खोडी आहेत त्या लक्षात घ्या... त्या शब्दांशी थोडक्यात म्हणजे मैत्री जमवा. यासाठी पहिली गोष्ट म्हणजे गुणांचा हिशेब विसरून जा. शंभरापैकी पस्तीस गुण मिळाले, की पास करतात म्हणून उरलेल्या पासष्ट गुणांचं अज्ञान तुम्ही खपवून घेत असलात, तर मग तुम्ही खरे विद्यार्थीच नव्हे.

तुम्ही एखाद्याशी दोस्ती जमवता म्हणजे काय? त्याच्या फक्त नाकाशीच दोस्ती जमवता? किंवा हाताशीच जमवता? तुमचा दोस्त तुमच्या घरी न येता नुसत्याच आपल्या चपल्या पाठवल्या तर चालेल तुम्हांला? नाही चालणार. तो संपूर्णपणाने तुमच्या घरी यायला हवा. तसंच विषयाचं आहे. तुमच्या पुस्तकाशी तुमचा संपूर्ण परिचय हवा. भूगोलाशी पुस्तकातली पस्तीस गुणांपुरतीच पानं पाठ केली असं म्हणणं म्हणजे भूगोलाशी तुम्ही दोस्तीच केली नाही म्हणण्यासारखं आहे.

हल्ली मुलींना गृहशास्त्र हा विषय असतो. त्यात भात-भाजी-वरण-पोळी-चटणी वगैरे स्वयंपाक करायचं शिक्षण असतं. आता गृहशास्त्रातली एखादी मुलगी म्हणाली, की १०० पैकी ३५ गुणांना पास ना, मग मी आपली नुसतचं वरण आणि चटणी करायचं शिकेन. म्हणजे वरणाचे पंचवीस आणि चटणीचे दहा मिळाले की पास; पण मग ती पुढे तिच्या घरी पाहुणे येतील, त्यांना काय वरण आणि चटणी वाढून 'हं, करा जेवायला सुरुवात; म्हणणार?

तुम्हांला नेमलेलं नवीन पुस्तक आलं, की खरं तर कळो ते अधाशासारखं वाचून काडःअलं पाहिजे. एखाद्या कवीची पाठ्यपुस्तकातली कविता तुम्हांला आवडली तर त्या कवीच्या आणखी कविता तुम्ही वाचायला हव्यात. आईने बशीत एकच करंजी दिली, की बाकिच्या करंज्या कुठल्या डब्यात ठेवल्या आहेत, ते हळुच पाहून ठेवता ना तुम्ही? मग एक कविता आवडली, की बाकीच्या कुठल्या पुस्तकात असतील हे शोधुन काढायला काय हरकत आहे?

तुमच्यापैकी कितीतरी मुलांना पोस्टाची तिकीटं गोळा करायचा, काड्याच्या पेट्यांवरची चित्र गोळा करायचा छंद असतो. अभ्यास हासुद्धा छंद झाला पाहिजे, तरच शिकणं हा आनंदाचा भाग होऊन जाईल. अभ्यास करणं हे कोडी सोडवण्यासारखंच आहे. कोडं सुटत नाही तोपर्यंत कठीण. ते सुटणार नाही म्हणून हातपाय गाळून बसणं, हे तर भ्याडपणाचं लक्षण आहे.

हिमालयाचं शिखर चढून जाणाऱ्या एका गिर्यारोहकाला एकानं विचारलं, "का हो, इतकी उंच शिखरं पाहून तुमची छाती दडपून जात नाही का? इतक्या उंच आपण कसं काय चढणार बुवा, या विचारानं तुम्हांला भीती वाटत नाही का?" तो म्हणाला, "पण मी कधी शिखराकडे पाहतच नाही. मी एक पाऊल टाकलं की दुसरं कुठं टाकायचं ते पाहतो. हातातल्या नकाशावर माझं लक्ष असतं. होकायंत्रावर दिशा पाहतो. एक पाऊल चढलो की म्हणतो, शिखर एक पाऊल आलं जवळ आणि असं करता करता माझ्या लक्षात येतं, आलं शिखर!"

पुस्तकातल्या पानांचं तसंच आहे. कसलाही विषय असो. त्या पानांत संपूर्णपणे घुसा... एकेका-एकेका ओळीत काय मजा आहे ते पाहत चला... अडलात एखाद्या ठिकाणी की ठरवा. उद्या हे गुरुजींना विचारायचं. घरात कुणी वडील माणूस अस्लं तर त्यांना विचारा. आपल्यापेक्षा वरच्या वर्गातल्या एखाद्या अभ्यासात आनंद वाटणाऱ्या मुलाशी दोस्ती करा. तुमच्या लक्षातसुद्धा येणार नाही, की पुस्तकाचं शिखर तुम्ही केव्हा गाठलंत. ते तुम्हीच आठवा बरं.--गेल्या वर्षी खालच्या इयत्तेत असताना तुम्हांला कठीण वाटलेलं गणित आता किती सोपं वाटतं ते. असंच पायरी-पायरीनं चढत जायचं असतं.

इंग्रजीसारख्या विषयात पोस्टाच्या तिकीटासारखा एक-एक शब्द गोळा करत गेलात आणि तुमचा आल्बल जसा तुम्ही पुन्हा पाहता तसा पाहत पाहत गेलात, की पाहा तुमची इंग्रजीशी दोस्ती जमते की नाही ते. मग शेक्सपिअर, डिकन्स, बर्नाड शॉ असले जगप्रसिद्ध लेखक, पत्र-मित्र असतात तसे तुमचे ग्रंथ-मित्र होतील. जी गोष्ट इंग्रजीची तीच गणिताची, विज्ञानाची, भुगोलाची आणि इतर विषयांची.

एखाद्याशी मैत्री जमवण्याचा उत्तम उपाय म्हणजे आपण आपल्या मैत्रीचा हात त्याच्यापुढे करणं हा. तुमच्या कानात सांगण्यासारखी हीच कानगोष्ट आहे. खेळापासुन ते गणितापर्यंत सगळ्यांशी मैत्री करा. म्हणजे पहा, परिक्षा हा त्या सगळ्या मित्रांशी आपली जोरदार दोस्ती आहे, असा जगाला दाखवुन देण्याचा आनंदाचा सोहळा होईल. या सोहळ्यात खूप यशस्वी व्हा... ही तुम्हां सर्वांना शुभेच्छा.

--
पु ल देशपांडे

मधुराधिपतये अखिलम मधुरम् (बालगंधर्व)

बालगंधर्वाच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात पुलंनी त्यांच्याविषयीच्या अतीव आदराने केलेलं हे दुर्मिळ भाषण.


मित्रहो, भाषणाच्या सुरुवातीला मी इतक्या वर्षांचा निर्ढावलेला माणूस असूनही घाबरून गेलो आहे. भाषणाला मुद्दे नाहीत म्हणून नाही, तर इतके मुद्दे आहेत की काय बोलावं ते समजत नाहीये.

बालगंधर्व या विषयावर मी काय बोलणार? उद्या जर कुणी सांगितलं की ‘चांदणं’ या विषयावर बोला. तर काय बोलणार? आपल्याला बोलता येत नाही हे न कळणारा माणूसच कदाचित बोलू शकेल.

बालगंधर्वाच्या प्रेमाने आजही इतकी माणसे एकत्र येताहेत हाच मुळी एक अद्भुत चमत्कार आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक कणा घट्ट आहे हे सिद्ध करणारी ही गोष्ट आहे. महाराष्ट्राची तीन सांस्कृतिक दैवतं आहेत. शिवाजी महाराज, लो. टिळक आणि बालगंधर्व! महाराष्ट्राने या तिघांवर भरभरून प्रेम केलं. त्यांना विभूतीमत्व दिलं. लोकप्रियता एक वेळ मिळते, पण विभूतीमत्व मिळत नाही. बालगंधर्वाविषयी अधिकारवाणीने बोलावे एवढा मला अधिकार नाहीये आणि त्याची मला जाणीव आहे ही त्यातल्या त्यात भाग्याची गोष्ट! मात्र एक सांगतो, तो अधिकार मला मिळण्याची शक्यता आहे. बालगंधर्व ज्या मार्गाने कलेकडे गेले तो मार्ग अनुसरला तर आपल्याला त्यांच्याविषयी (निदान) बोलायचा अधिकार मिळू शकतो.

बालगंधर्व हे भक्तिमार्गी कलावंत होते. त्यांनी प्रत्येक भूमिकेकडे अगदी प्रेमात पडून पाहिलं. त्यांनी एखाद्या भूमिकेचा विचार केला, चर्चा केली असं मला वाटतच नाही. ‘एकच प्याला’तली सिंधू त्यांनी वाचली, ऐकली आणि ते सिंधू होतच गेले. मात्र त्या तन्मयतेत त्यांनी स्वत:ला वाहू दिलं नाही. ते नुसतेच प्रतिभावंत नव्हते तर उत्तम प्रज्ञावंतही होते. परिष्करणाची तर त्यांना अतिशय आवश्यकता वाटायची. त्यामुळे त्यांची भक्ती आंधळी न ठरता डोळस ठरली.

बालगंधर्वाच्या गायकीबद्दल बोलायचं तर भारतीय संगीतातल्या गायकीबद्दलच बोलायला पाहिजे. ते नाटकात गायले म्हणून ती नाटकातली गायकी असं म्हणणं चुकीचं ठरेल. बालगंधर्वाचा यमन आणि भास्करबुवांचा (बखले) यमन यांची जातकुळी वेगळी नव्हती. कारण फक्त निराळं होतं. अर्थात बालगंधर्वाना अजून एक दैवी देणगी लाभली होती. ती म्हणजे त्यांचा स्वर हा जन्मजात भिजलेला स्वर होता. त्याला अंत:करणातल्या प्रेमाच्या ओलाव्याचा स्पर्श होता. बालगंधर्वाची म्हणून एक खास गायकी होती. त्यांच्या सगळ्या भूमिका बघा. त्यातलं जे प्रेम आहे ते सुसंस्कारीत प्रेम आहे. ‘सुखविलासी सोडी न विनया’ अशा प्रकारचं प्रेमाला सुखसंवेदना स्फुरावी असं ते प्रेम आहे. त्यांनी स्त्रीभूमिका केल्या. त्यातून स्त्रीत्वातलं जे जे काही पवित्र, सुंदर, सात्त्विक अशा प्रकारचं आहे त्याचं त्यांनी आपल्या अभिनयातून दर्शन घडवलं. म्हणूनच लोकांची त्यांच्यावर भक्ती जडली.

माझ्या बाबतीत म्हणाल, तर वयाच्या ६-७ व्या वर्षांपासून बालगंधर्वाच्या संस्कारात वाढलेला मी एक मुलगा आहे. (पूर्वी मुलगा होतो- आता राहिलेलो नाही, पण बालगंधर्व म्हटलं की मला माझं मुलगेपणच आठवतं) बालगंधर्वाचं नाटक म्हणजे आमच्या घराचा एक कुळाचारच होता. कुलदैवतेला जसं दरवर्षी जातात तसं आम्ही दरवर्षी बालगंधर्वाच्या नाटकांना जायचो. त्यांची नाटक कंपनी मुंबईत आली की त्यांचं नाटक आपल्या मुलांना दाखवलंच पाहिजे हा संस्कार त्यांच्यावर झालाच पाहिजे अशी जिद्द- आवड- ओढ असलेले आई-वडील मला मिळाले हे मी माझं सगळ्यात मोठं भाग्य समजतो. घरामध्ये एखादं लग्नकार्य असावं अशा तऱ्हेने लोक नाटकाला यायचे. ती नाटकं म्हणजे एखाद्या धार्मिक संस्कारासारखा उत्सव असायचा. असा उत्सव मी परत पाहिला नाही. नाटकांची लोकप्रियता पाहिली. माझीही नाटकं काही लोकप्रिय झाली (चुकून!) पण लोकांचा असा अमाप उत्साह मी पाहिला नाही. एखाद्या लग्नकार्याला जावं तसे कपडे घालून, नटून-थटून लोक नाटक बघायला यायचे. नाटकातल्या सुभद्रेपेक्षा ते बघायला येणारी बाईच जास्त नटलेली असायची. कारण ते फक्त नाटकाला जाणं नसायचं तर एक प्रकारचा उत्तम सांस्कृतिक अनुभव घेणं असायचं. अशा वृत्तीने लोक जायचे आणि बालगंधर्वही अशा वृत्तीने जाणाऱ्या लोकांच्या पदरात पुरेपूर माप टाकायचे.

पडदा वर जायचा. रंगमंचावर लाईटस् पडायचे. ‘प्रभुपदास नमित दास’ म्हणून नांदी सुरू व्हायची आणि खरं सांगतो, ज्या क्षणी- हा क्षण भोगायला आपण जिवंत आहोत याचा अभिमान वाटतो- असा तो क्षण असायचा. असे असंख्य क्षण ज्या माणसाने आपल्याला दिले त्या माणसाचं नाव नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व! त्यांनी आम्हा सगळ्या लोकांच्या क्षणाचं, आयुष्याचं सोनं करून टाकलं!


नारायणरावांनी जे केलं ते अमूल्य होतं. बिनतोड होतं. ‘नाथ हा माझा’ मधल्या यमनाची काय किंमत ठरवणार तुम्ही? एक गोष्ट सांगतो, नारायणरावांनी जरूर नसलेलं असं काहीच केलं नाही. असं वाटायचं की ही तान इथेच पाहिजे होती. मोठय़ा कलाकारांचे हे वैशिष्टय़ आहे, त्यात दुरुस्ती सुचविता येत नाही. ताजमहालमध्ये थोडी अशी दुरुस्ती हवी होती असं नाही म्हणता येत. बालगंधर्वानी जे केलं त्याला पर्यायच नसायचा. शिवाय आपण काहीतरी विशेष करून दाखवतोय असा आविर्भावही त्यात नसायचा. हे घडतंय, हे होतंय असंच वाटायचं. त्यात एक सहज बरोबर जन्मलेला नैसर्गिक भाव असायचा. नाटकात एखादं राजाचं पात्र असतं. त्याने कुणाला शिक्षा केली तरच तो राजा ठरतो असं नाही. त्याचं वागणं बोलणं असं असलं पाहिजे हा राजा आहे. हा भाव तुमच्या मनात निर्माण झाला पाहिजे. बालगंधर्व जे काही करत होते ते सहजतेनं करत होते. तद्रूप होऊन करत होते. ते काहीही सिद्ध करण्यासाठी गात नव्हते. ते फक्त गात होते. गाण्याच्या प्रत्येक शब्दाला, अक्षराला, लयीला धरून ते गात होते.

संगीत नाटकं आल्यावर बरेचसे समीक्षक- जे संगीतातले औरंगजेब होते, ते म्हणाले, संगीत आणि नाटक यांचा गोंधळ केला. अहो, संगीताने काय गोंधळ केला, संगीत ही गोंधळ करणारी विद्या आहे का? ज्यांना गाता येत नाही ते गोंधळ करत असतील, पण तो संगीताचा दोष नव्हे. हे म्हणजे फुलांनी पूजेचा गोंधळ केला म्हणण्यासारखं आहे. या लोकांना आपली परंपरा किती माहीत नाही याचं एक उदाहरण सांगतो. एकदा एक महान समीक्षक मला म्हणाले, काय तुमचे ते बालगंधर्व! ते ‘कशी या त्यजू पदाला’ गाणं म्हणत असायचे, तेव्हा तो सिंधूचा बाप नुसता मख्खासारखा उभा! मी म्हटलं, साहेब, सगळं ऑडियन्स ‘कशी या’ गाणाऱ्या बालगंधर्वाकडे तल्लिन होऊन बघत असताना तुम्ही सिंधूच्या बापाकडे कशाला बघत बसलात? म्हणजे नाटक कसं बघावं हे ज्यांना कळत नाही, त्यांना संगीत नाटकांचा परस्परसंबंध कसा कळणार?

जेव्हा गद्य शब्दांची शक्ती संपते तेव्हा काव्य सुरू होतं. गाणं सुरू होतं. आईला जेव्हा वात्सल्याचं भरतं येतं तेव्हा ती मुलाला ‘तो एक नंबरचा चमचा घे. तोंडात घाल’ वगैरे सांगत बसत नाही. ती सरळ ‘घास घेरे तान्ह्य़ा बाळा’ असं गायला लागते. तिला जे म्हणायचं असतं ते सुरांच्या मदतीशिवाय म्हणता येत नाही. कीर्तनातही एखादा नाटय़मय प्रसंग उभा करायचा असेल तर गाण्यांचाच आधार घेतला जातो. कल्पना करा, कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुतलेलं आहे, असा प्रसंग आहे. अर्जुन त्याच्यावर बाण सोडतोय. तो गद्यात कितीही वर्णन केला तरी अपुराच पडणार. पण त्याच वेळी कीर्तनकाराने उच्च रवात ‘रथचक्र उद्धरु दे, श्रुतीशास्त्र ये फळाला’ असा स्वर लावला की तो कर्ण, अर्जुन, तो एकंदर प्रसंग नजरेसमोर उभा राहतो. प्रसंग सजीव होतो. ‘नाथ हा माझा मोही खरा’च्या प्रसंगी ते आले, त्यांना मी प्रथम पाहिले म्हटल्यावर तिला जे वाटलं, ते तिनं पद्यातच म्हटलं पाहिजे. गद्यामध्ये ती शक्ती नाहीये.

मानापमानातला ‘नाही मी बोलत नाथा’चा प्रसंग घ्या. (बायका जेव्हा ‘काहीतरी बोलू नका’ असं म्हणतात तेव्हा त्यांना ‘काहीतरी बोला’ असं म्हणायचं असतं. स्त्री जेव्हा ‘चला’ म्हणते तेव्हा उठून जायचं नसतं. बसायचं असतं. हे समीक्षकांना कळणार नाही.) ‘नाही मी बोलत नाथा’ हे बालगंधर्व किती प्रकारे सांगतात? ज्यांना गाणं कळत नाही, त्या मूर्ख लोकांनी त्याला ‘दळण घालणं’ म्हटलं. त्यांना कळलंच नाही ते. ‘नाही मी बोलत’ हे ५० वेळा नव्हे तर ५० तऱ्हांनी म्हटलेलं असायचं. एकासारखी दुसरी नाही. दुसऱ्यासारखी तिसरी नाही. उगीच नाही बालगंधर्वाची साथ करताना मी- मी म्हणवणाऱ्या तबलजींची बोटे दुखून येत. लयीतल्या सूक्ष्मातिसूक्ष्म बदलाची त्यांना जाणीव होती.

काहींनी त्यांच्या गाण्यांवर आक्षेप घेतला की तिथे नाटक थांबायचे आणि गवई गात सुटायचे. वास्तवात कुणी गातो का? आता त्यांना काय सांगावं? नाटक ही गोष्टच मुळी अंतरंगातली वास्तवता घेऊन येते. बहिरंगातली नव्हे! बहिरंगातली वास्तवता त्यात येईलच कशी? लोक तिकीट काढून नाटकाला येतात, पडदा वर जातो तिथे प्रॉम्टर असतो. त्यातला शिवाजी, शिवाजीच्या मिशा सगळं खोटंखोटंच असतं. पण हे खोटं नाटक आपल्याला जीवन किती खरं आहे, विविधांगी आहे हे सांगत असतं. नाटकातलं गाणं हे कृत्रिम वगैरे काही नाही. तो त्याचा एक भाग आहे. लंगडीच्या खेळात कुणी म्हटले, दोन पाय असून एका पायाने कशाला धावायचे, तर त्याला काय उत्तर देणार? तो खेळच तसा आहे. तसं नाटकाचं आहे. गाणं नाटक थांबवत नाही. ते नाटक बघणाऱ्याची चित्तवृत्ती अधिक प्रफुल्लित करतं आणि नाटक पुढे नेतं. बघणाऱ्याची चित्तवृत्ती अधिक प्रफुल्लित करतं एका नाटकाचा नांदीपासून भरतवाक्यापर्यंतचा प्रवास हा डेक्कनक्वीनसारखा ठराविक वेळ ठराविक स्टेशनं घेत केलेला (आखीव-रेखीव) प्रवास नसतोच मुळी! तो एका सुंदर उद्यानाचा फेरफटका आहे. त्यातली प्रत्येक सुंदर जागा बघत, सौंदर्यस्थळं निरखत रमतगमत केलेला तो एक उन्मुक्त फेरफटका आहे.

भारतीय संस्कृतीत संगीताला मोठं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आमचा तत्वज्ञानपर ग्रंथ- गीता- हा पद्यात आहे. लग्नामधल्या मंगलाष्टकांना दुसरी (उडती) चाल लावून बघा. लग्न लागण्याऐवजी मोडलं असं वाटेल.

नाटक हा एक यज्ञ आहे. त्यात सगळे कलाकार आपापला हविर्भाग अर्पण करतात. नट येतो. अभिनय करतो. गायक येतात. गातात. नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, तबलजी, सारंगिये येतात. प्रत्येक जण आपली आहुती अर्पण करतो. बालगंधर्वानी आपल्याला काय दिलं? जीवनामध्ये सौंदर्य हे एक मूल्य आहे हे मनावर ठसवलं. सुबकपणे जगणं, सुरेख रीतीने मांडणी, गाणं शिकवलं. बरं हे सर्व अगदी सहज रीतीने शिकवलं. स्त्रीत्वात जे काही मोहक, सुंदर, मधुर आहे ते त्यांनी अभिनयानं दाखवलं. म्हणूनच ५-५ पिढय़ांनी त्यांचा अभिनय बघितला. बालगंधर्व म्हातारे होऊ शकतील, पण लय म्हातारी होणार नाही. त्यांनी मात्रांचा हिशेब बोटांवर नाही घातला. अंत:करणात घातला. म्हणूनच त्यांचे संगीतशास्त्रीय प्रमाद त्यांचे गुण ठरले. त्यांनी भीमपलासात शुद्ध निषाद लावला. इतर कुणी लावला असता तर संगीताच्या रखवालदारांनी ते करणाऱ्याची जीभ कापली असती. बालगंधर्वाच्या बाबतीत हे फक्त तुम्हीच करू शकता, असं म्हणून सर्वानी त्यांचे पाय धरले. एकदा बालगंधर्वाचा षडज् ऐकताना भीमसेन (जोशी) म्हणाला होता, आपल्या तंबोऱ्याच्या भोपळ्यांची भाजी करून खावी! खरं आहे ते! बालगंधर्व फार थोडे आणि सोपे राग गायले. फार मोठे राग गाऊन आपण काही करामत करतोय असं त्यांना दाखवायचंच नव्हतं.


बालगंधर्वानी खूप वेडेपणा (अव्यवहारीपणा) केला. हजार-हजार रुपयांचे शालू घेतले. पण ते नारायणराव बालगंधर्वासाठी नव्हते. तो शालू द्रौपदीचा होता. सुभद्रेचा होता. राजा भीष्मकाच्या राजकन्येचा होता. मायबाप प्रेक्षकांच्या मनावर रुक्मिणी ठसावी म्हणून होता. ते सगळं रंगदेवतेसाठी होतं. प्रेक्षकांसाठी होतं. त्यांची तारीफ करून आम्हाला काय मिळवायचं? त्यांच्या हाती कुठली सत्ता होती? ते मंत्री नव्हते, उपमंत्री नव्हते. क्रेडीट सोसायटीचे चेअरमनही नव्हते की एखादं लोन पास करतील. पण खरं सांगायचं तर त्यांनी इतका आनंद दिला की त्यांचे ऋण फेडताच येणार नाही.

बालगंधर्वाबद्दल बोलणं संपणारच नाही. त्याचा कधी कंटाळा येणार नाही. चांदण्याचा, गंगेच्या ओघाचा, गुलाबाचा, जाईच्या सुगंधाचा कधी कंटाळा येईल का? वल्लभाचार्य म्हणतात, ‘रुपं मधुरम्, गीतं मधुरम्, वचनं मधुरम्, नयनं मधुरम्, हसितं मधुरम्, चरितम् मधुरम्, ललितं मधुरम्, मधुराधिपतये अखिलं मधुरम्.’

गदिमा म्हणाले, ‘असा बालगंधर्व आता न होणे’ ते सर्वस्वी खरं आहे. त्यांच्या शंभराव्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचं संकीर्तन करायची मला ही जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. कुणीतरी म्हणालं, बालगंधर्वाचा तीन दिवसांचा महोत्सव करावा. मी म्हणतो तुमच्या पुढच्या पूर्ण आयुष्यात सर्वकाळ बालगंधर्वाचा, कलेचा, कलाप्रेमाचा उत्सव साजरा होवो. हीच माझी शुभेच्छा!

लोकसत्ता, ८ नोव्हेंबर २००९

Wednesday 22 April 2015

चहा

चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असता ...
अवती भोवती पाहता पाहता हळूच चहाचा घोट घेताना तुमच्या लक्षात येते..
अरेच्या!!
साखरच घालायला विसरलो की काय....
पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले तुम्ही कसाबसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती, कपाच्या तळाशी बसलेली न विरघळलेली साखर...
आयुष्य असच असतं...
सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच असतात, त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे....
एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे....
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे....
मान - अपमान मैत्रीत काहीच नसतं....
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहीजे.
जगाच्या या रंगमंचावर असे वावरा, की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.
जगातील सर्वात महाग पाणी कोणते, तर अश्रू ... कारण त्यात एक टक्का पाणी आणि ९९ टक्के भावना असतात.
त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका..
हसा आणि हसवत रहा…!!


--
पु. ल. देशपांडे

Monday 8 December 2014

संगीतमय पु.ल.

हार्मोनियमवादक पु.ल.


संगीताबद्दलची माझी उपजत आवड लक्षात आल्यावर माझ्या वडिलांनी मला पेटी आणून दिली. पेटी वाजवण्याच्या या नादातून मी जरी गोविंदराव टेंबे झालो नाही तरी एक उत्तम श्रोता मात्र झालो. पेटीवादनाचे जाहीर कार्यक्रम केले नाहीत, पण भावगीतं म्हणतांना हातात पेटी घेऊनच गायलो. गाण्यांना चाली लावतांना आणि संगीतदिग्दर्शन करतांना पेटी खूप उपयोगी पडली.



 
अनेक थोर गायकांच्या मैफिलींत पेटीची साथ करण्याचं भाग्य मला लाभलं. पुढील आयुष्यात मला ज्या थोर गायकवादकांचा स्नेह, सहवास आणि आपुलकी लाभली, त्यांच्याशी सुखसंवाद साधता आला त्याचं बरंचसं श्रेय या संवादिनीलाच द्यायला हवं.


गायक पु.ल.

गाण्याचे विशेष असे शिक्षण न घेताही पु.लं.ची गाण्यातील समज असामान्य होती. खूप चांगले ऐकायला मिळावे ही धडपड अखेरपर्यंत होती. पु.लं.च्या सांगीतिक कामगिरीचा विचार केला, तर बहुतेकांना बटाट्याच्या चाळीतील 'संगीतिका' हा त्यातील सर्वोत्कृष्ट आविष्कार वाटतो. दुर्देवाने आमच्या पिढीला साक्षात पु. लं. कडून तो आविष्कार पाहण्याचे भाग्य मिळाले नाही. पण त्या संगीतिकेत एकेका ओळीत पु.ल. एकेका गायकाची गायकी दाखवीत. त्यामुळे जाणकाराला ती एक मेजवानीच असे. थोडक्यात काय, पु.लं.ची कुठलीही कलाकृती सामान्यांपासून जाणकारांपर्यंत प्रत्येकाला भरभरुन आनंद देत असे.
'साहित्य सूची' मधील एका लेखात 'श्री. गंगाधर महाम्बरे' म्हणतात, डेक्कन क्विनच्या प्रवासात मला त्या दिवशी वेगवेगळ्या गायकांच्या गायकीची अधूनमधून आठवण करुन देत पु.लं.नी 'बटाट्याच्या चाळी'मधील पुढच्या ओळींची पारायणे केली:
'रामा चुकलो। मज करि क्षमा ॥
वस्त्रविश्रामा, पात्रप्रोक्षण कामा ॥
पर्णभरित, मुख, कर्ण विडीयुत ॥
कुरल केश शिर तेल विभूषित ॥'

या ओळीतील 'मज करि क्षमा' ऐकताना छोटागंधंर्वांची आठवण झाली तर 'वस्त्रविश्रा(आ)मा' ऐकताना बालगंधंर्वांची याद आली. 'पर्ण भरित मुख' ही ओळ ऐकताना पंडितराव नगरकर तोंडात पानाचा विडा चघळत गात, मा. दीनानाथ जशा अस्मानी ताना घेत तशी तानांची भेंडोळी सोडली. आणि शेवटी 'कुरल केश शिर तेल विभूषित' म्हणताना सुरेश हळदणकरांच्या 'श्रीरंगा कमलाकांता'तील 'ब्रिजवासी नारी'नी हजेरी लावली!
या कॅसेटमध्ये पुलंच्या आवाजात खालील गाणी ऐकायला मिळतात:
बाई या पावसानं(१९४३)
पाखरा जा- नाटक 'वहिनी'(१९४६)
ललना कुसुम कोमला- नाटक 'वहिनी'(१९४६)
जा जा ग सखी- चित्रपट 'कुबेर'(१९४७)
उघड दार (१९४३)

विज्ञानप्रेमी पु.ल.

साहित्य, संगीत, नाटक इ. कला क्षेत्रांत रमत असताना, पुलंना आपल्या संस्कृतीची, जुन्याची ओढ होती, परंतु सनातनी गोष्टींची चीड होती. समाजाला उपकारक असे शोध, त्यामागची शास्त्रज्ञांची धडपड याचे त्यांना कौतुक वाटे. वैज्ञानिक उपक्रम राबवणाऱ्या संस्था, प्रयोशाळा, पुण्यातील 'आयुका' सारख्या संस्थांना सुद्धा 'पु. ल. देशपांडे फाऊंडेशन' तर्फे देणग्या दिल्या होत्या. पुलंचा एक कमी परिचित पैलू म्हणजे, समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा, व विशेषत: मराठीतून विज्ञानाचा प्रसार व्हावा, याबद्दल त्यांना खूप आस्था होती.
'मराठी विज्ञान परिषदेने' १९७१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'अस्मिता महाराष्ट्राची' या ग्रंथाला पुलंची प्रस्तावना होती! त्या प्रस्तावनेतील काही भाग..


'... मी जीवनातील कोडी बुद्धीने आणि अभ्यासाने जाणून घेईन, ही जिद्द आणि मला ती जाणता येईल हा आत्मविश्वास म्हणजे वैज्ञानिक दृष्टी. माणसाला अज्ञात अशा असंख्य गोष्टी आहेत. परंतु त्या अज्ञाताचा भेद करुन ते मी ज्ञात करुन घेईन, ह्मा धडाडीने निसर्गाचे विराट स्वरुप जाणून घेणे हे वैज्ञानिकांचे कार्य आहे. आणि ते वैयक्तिक साक्षात्काराच्या समाधानात न राहता, त्या ज्ञानाभोवती कसलीही गूढ वलये किंवा बुवाबाजी न करता, ते ज्ञानसोपान स्वच्छपणे ग्रंथातून दाखवणारे हे जगाचे खरे उपकर्ते आहेत. वैयक्तिक मोक्षाकडून सामाजिक मोक्षाकडे नेणारे विज्ञान हे जपतप-अनुष्ठानापेक्षा अधिक तारक आहे. विठ्ठलाला अठ्ठावीस युगात हटवता न आलेला पंढरपुरातला कॉलरा विज्ञानाने हटवला... नव्या मोटारीपुढे नारळ फोडून तिची गुलाल लावून पूजा करणारे मोटार नावाची एक नवीन देवता निर्माण करतात. ते मनाने वैज्ञानिक झालेले नसतात. खंडाळ्याच्या घाटात एक शिंगरोबाचे देऊळ आहे. त्याला दहा पैसे ठेवून प्रवास निर्विघ्न कर असे म्हणणाऱ्यांना दहा पैशाच्या जकातीवर देव खूष होतो, हा देवाचा अपमान आहे असे वाटत नाही. त्या शिंगरोबाला दहा हजार रुपये दिले तरी पेट्रोलशिवाय मोटार चालणार नाही.. वैज्ञानिकांनी आता विज्ञान परिषद स्थापन केली आहे. खरे सांगायचे तर विज्ञानाच्या बाबतीत आमची पिढी ह्मा पोरांपुढे साक्षात अडाणी आहे... चंद्रावरच्या स्वारीचे माझे शिक्षण माझ्या कुटुंबातील बालगोपालांनी केले आहे. आणि हे सारे ज्ञान त्यांनी मराठी पुस्तकांतून आणि लेखांतून मिळवले आहे. मराठी परिभाषेला हसणारे लोक मराठी भाषेला मिळणाऱ्या ह्मा नव्या शक्तीकडे पाहतच नाहीत...'

'टेलिफ़ोनचा जन्म' या श्रृतिकेतील काही भाग...

निवेदक : यशाचा तो खडकाळ रस्ता अजून वर्षभर तुडवायचा होता. हे नवीन यंत्र बोजड दिसत होतं. ते सुबक करणं आवश्यक होतं. नवी सामग्री हवी होती. बेल आणि वॉटसन् राबत होते. हबर्ड वकील द्रव्याचा पुरवठा करित होते. असला धनिक पाठीशी असणं हे बेलचं भाग्य! अनेक संशोधक बिचारे संशोधनासाठी लागणारा पैसा गोळा करतां करतां नामोहरम झाले.
१८७६ च्या उन्हाळयात फिलाडेल्फियाच्या शतसंवत्सरिक प्रदर्शनांत अलेक्झांडर ग्रॅहाम बेलने आपला टेलिफ़ोन लोकांपुढे ठेवला.
(संगीत)
आवाज: काय आहे हो हें?... टेलिफोन? काय? तारेतून आवाज जातो? हॅ हॅ हॅ हॅ !
निवेदक: वर्तमानपत्रांचाही असाच कुत्सित स्वर होता. न्यूयॉर्क ट्रिब्यूनच्या अंकांत होतं-
आवाज: असल्या यंत्राचा काय उपयोग आहे? सरकारी कामांत अनेक वेळां गुप्ततेची आवश्यकता असते. दूरदूरचे सरकारी अधिकारी जर ह्या यंत्रांतून मोठमोठ्यांने बोलू लागले, एखादा प्रियकर प्रेयसीच्या कानांत बोलूं इच्छीत असला तर?
बेल: अस्सं! म्हणजे टेलिफोन ही लोकांना चेष्टा वाटतेय्. ह्या संशोधनांचे काय काय फायदे आहेत ते शेवटचा श्वास असेपर्यंत साऱ्या देशाला पटवून देईन.
(संगीत)
निवेदक: एका वर्षाच्या आंत बेलनें संशोधकांचीच नाही तर साऱ्या देशाची खात्री पटवली. ह्या तरुण संशोधकाची दैनंदिनी त्याची ग्वाही देते.
बेल: मे १८७७. मेबलच्या वडिलांनी बेल टेलिफोन कंपनी स्थापन केल्याची हकीगत सांगितली. अनेकांनी भांडवल गुंतवलं आहे. टेलिफोनचं उत्पादन, टेलिफोन भाड्यानं द्यायचं, तारा टाकायच्या, साहाय्य करणाऱ्यांचा उत्साह पाहून मन आनंदानं भरुन येतं-- ताजा कलम हबर्ड वकीलांना मेबलविषयी विचारायला हरकत नाही.
(संगीत)
बेल: जून १८७७- पुढच्या आठवड्यांत माझा आणि मेबलचा विवाह- मधुचंद्रासाठीं इंग्लंडची सफर.
(संगीत)
बेल: जून १८७८- हारफर्डला पहिला सेंर्टल स्विच बोर्ड उघडला. एका स्विचबोर्डावर आठ कनेक्शन्स- कल्पनासुद्धां नव्हती.
(संगीत)
बेल: बोस्टनला सेंट्रल स्विचबोर्ड सुरु झाला. स्विचबोर्डावर काम करायला पुरुषांपेक्षा बायका अधिक योग्य आहेत. एक तर त्यांची बोटं भराभर काम करतात आणि आवाज गोड.
(संगीत)
बेल: ऑक्टोबर १८८१. पंचेचाळीस मैल लांबीच्या अंतरावर टेलिफोन बसवले. लोक म्हणतात, इतक्या दूरवर आवाज जाणार नाही. कां नाही जाणार? शेकडो मैल दूर जायला हवा. हजारों मैल अंतरावरची माणसं टेलिफोननी कां जोडली जाऊ नयेत?
निवेदक: ही कल्पना प्रत्यक्षांत उतरायला ३५ वर्ष लागली. १९१५ ची गोष्ट. न्यूयॉर्कमध्यें अलेक्झांडर बेल आणि पस्तीसशे मैल दूर सान्फ्रान्सिकोला त्यांचा जिवाभावाचा सोबती वॉटसन- दोघेही पुढ्यांत टेलिफोन घेऊन बसले. त्या ऐतिहासिक प्रसंगाचे चित्र घ्यायला गर्दी करुन फोटोग्राफर उभे होते. टेलिफोनची घंटा वाजली. आणि थॉमस वॉटसनने काही वर्षांपूर्वी पलीकडच्या खोलींतून जो आवाज ऐकला तोच परिचित आवाज देशाच्या दुसऱ्या टोकापासून ऐकला.
बेल: (फिल्टर) मिस्टर वॉटसन्, जरा इकडे या. तुमची गरज आहे.
(संगीत)
निवेदक: अलेक्झांडर ग्रॅहाम बेल १९२२ साली वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी वारले. टेलिफोनच्या संशोधनांतून त्यांनी अमाप संपत्ति मिळवली. त्याहूनही टेलिफोन दैनंदिन जीवनांत गेलेला त्यांनी पाहिला. पण बेल टेलिफोन पद्धतीचा आज झालेला विकास त्यांच्या स्वप्नातही आला नसेल. जगाच्या या टोकाला राहाणाऱ्या एका माणसानं दुसऱ्या टोकाला राहाणाऱ्या माणसाला म्हणावं- हॅलो ऽ
... अपूर्ण (टेलिफ़ोनचा जन्म')

--
पु. ल. देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे)

Friday 29 November 2013

एक शून्य मी..

... मानवी इतिहासात हे सदैव असेच चालत आले आहे का? आत्मवंचना करत जगत राहण्याखेरीज काही इलाज नाही का? बालवयात, तरुण वयात, मनाच्या तुलनेने अधिक अपिरपक्व अवस्थेत ज्याला आपण संस्कृती संस्कृती समजत आलो तशी कधी संस्कृती होती का? गायन, वादन, नर्तन वगैरे कला देवळांच्या परिसरात वाढल्या म्हणतात. कला आपोआप थोड्याच वाढतात? त्या वाढवणारी हाडामांसाची माणसे असतात. त्या गायिका, त्या गायिका, नर्तिका ह्मांना न गाण्याचे किंवा न नाचण्याचे स्वातंत्र्य होते का? एखाद्या गणिकेच्या कन्येला गावातल्या देवदर्शनाला येणाऱ्या स्रिसारखे आपल्या नवऱ्याशेजारी बसून त्या देवाची पूजा करण्याचे भाग्य लाभावे असे वाटले तर तिचे कुणी सालंकृत कन्यादान केल्याचा कुठे इतिहास आहे का? की कुत्र्याच्या जन्मकाळा पासून त्याला हाडकावरच वाढल्यामुळे, पुरणपोळी ही आपल्या खाण्याची वस्तूच नव्हे असे त्याला वाटावे, तसे त्या नर्तकींना लग्न ही आपल्या कामाचीच गोष्ट नव्हे असे आपण वाटायला लावले? अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते. आणि कुठलेही मोहोळ उठले, की अंगावर फक्त डंख उठवणाऱ्या माशांशी मुकाबला करुन प्रत्येक जण त्याचा तो राहतो, तशी काहीशी माझी अवस्था झाली आहे. डोक्याला ही प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी? डोळयांवर आघात करणाऱ्या गोष्टी टाळायच्या असतील तर डोळे त्या गोष्टींकडून दुसरीकडे फिरवता यायला हवेत! स्वत:च्या अपूर्णतेची जाणीव होत असताना अपूर्णाची पूर्णावस्था शून्याच्याकडेच स्वत:ला नेताना दिसते.

परवाचीच गोष्ट. किराणाभुसार दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्यातेलासाठी भलीमोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. दुकानदार डोळयांत तेल घालून थेंबाथेंबाचा दाम दसपटीने वसूल करत होता. तेवढ्यांत त्या रांगेतल्या एका फाटक्या परकरपोलक्यांतल्या पोरीचा नंबर लागला. तिने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली.
दुकानदार "तेलाचं भांडं कुठाय?" म्हणून खेकसला.

ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या."

"अग, दिवाळीला अवकाश आहे! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली.

पण दारिद्रय धिटाई शिकवते. लगेच सावरुन म्हणाली,

"दिवाळी कसली? खायला त्याल द्या..."

"ह्मा पणतीत?" दुकानदार म्हणाला.मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले."यवड्या पैशात किती बसतं ते द्या"

"अग, दहा पैशाचं तेल द्यायला माप कुठलं आणू?"

"पण आमच्याकडे धाच पैशे हाइत."पोरीने स्वत:चा 'आमच्याकडे' असा बहुवचनी उल्लेख केलेला पाहून त्या परिस्थितितही मला मजा वाटली.

"अहो, कमीत कमी किती पैशाचं तेल देऊ शकाल तुम्ही?"

"अँटलीस्ट फिफ्टीन!" दुकानदार.

त्याला ते सांगताना लाज वाटली असावी. नाहीतर तो इंग्लिश बोलला नसता. आपल्याकडे युटेरस, पाइल्स, सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे शब्द आपण असेच लाज लपवायला इंग्लिशमधून वापरतो. त्याची आणखी पाच पैशांची सोय केली. पोरीची पणती तरीही पुरती भरली नव्हती. तिच्या घरी पणतीहून अधिक मापाचे 'खायाचे तेल' परवडत नाही. आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे. पणत्यांची आरास पाहिली, की 'आमच्याकडं धाच पैसे हाइत्' म्हणणारी ती मुलगी- नव्हे, एक प्रचंड आक्रोश मला ऐकू येतो. दिवाळीसारख्याच अनेक गोष्टींची नाती तुटत तुटत मी शून्य होत जातो. तरीही जगतो. ह्मा शून्याच्या मागे नकळत एखादा आकडा येऊन उभा राहतो. मला मी कधी दहा झालो आहे, कधी वीस, कधी तीस, असेही वाटायला लागते. कुणीतरी सांगत येतो, की अमक्या अमक्याच्या बायकोने रुग्णशय्येच्या उशाखाली एक चिठ्ठी ठेवली होती. तिच्यावर लिहिले होते, की माझ्या मृत्यूनंतर माझे प्रेत ससून हॉस्पिटलमधल्या विद्यार्थ्यांना शवविच्छेदनाला द्या. त्यांना उपयोग होइल. ह्मा बातमीने मग माझ्या शून्यामागे एक फार मोठा आकडा उभा राहून मला शून्याची किंमत दाखवून जातो. त्या बाईची आणि आपली ओळख असायला हवी होती असे वाटते. आता जगणे म्हणजे नुसता श्वासोच्छ्वास राहत नाही. त्या किराणा-भुसार दुकानदाराच्या दारातल्या पोरीने माझे मातीच्या पणतीचे दिवाळीशी जडवलेले नाते तोडले एवढेच मला वाटले होते : पण त्या पोरीशी माझे नाते कां जडावे ते कळत नाही. ती कुठे राहते? तिच्या हक्काची झोपडी तरी असेल का?

झाले ! म्हणजे प्रश्नातून सुटका नाही. माझीच नव्हे, कुणाचीच नाही! मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो. आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामिचन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती!

--
पु. ल. देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे)